सुभेदार रामजी मालोजी सकपाळ स्मृतिदिन

HomeNewsनागपुर डिवीजन

सुभेदार रामजी मालोजी सकपाळ स्मृतिदिन

✹ २ फेब्रुवारी ✹
सुभेदार रामजी मालोजी सकपाळ स्मृतिदिन
जन्म – १४ नोव्हेंबर १८३८ (पुणे)
स्मृती – २ फेब्रुवारी १९१३ (मुंबई)
गौतम नगरी चौफेर (आवारपूर) – आदर्श पिता रामजीबाबा आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. रामजीबाबा वयाच्या १८व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या १०६ च्या सॅपर्स अँड मायनर्स विभागात भर्ती झाले. रामजीबाबांचे लष्करातील कसब पाहून त्यांना सेव्हन पायोनिर बटालीयन मध्ये बढती देण्यात आली. रामजीबाबा हे लष्करात नोकरी करीत असले तरी ते फार कुटूंबवत्सल, धर्मभोळे आणि शिस्तप्रिय स्वभावाचे होते. त्यांच्यावर कबीर पंथाचा प्रभाव होता. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील आंबेटेंबें गावात स्थायिक असलेल्या लष्करातील सुभेदार रामजी मेजर धर्माजी मुरबाडकर यांच्या द्वितीय कन्या भीमाबाई यांच्यासोबत रामजीबाबांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांना एकूण चौदा अपत्ये झाली. त्यापैकी १४ एप्रिल १८९१ रोजी जन्माला आलेले भीमराव हे चौदावे रत्न. रामजीबाबांची प्रखर बुद्धिमत्ता आणि खेळातील प्राविण्य पाहून कंपनी सरकारमधील एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना पुण्यातील नॅार्मल स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. येथे रामजीबाबांनी डी.एड. चे शिक्षण घेतले आणि लष्कराच्या छावणीत शिक्षक आणि कालांतराने मुख्याध्यापक म्हणून १४ वर्षे नोकरी केली. रामजीबाबांचे कर्तुत्व पाहून ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना ‘सुभेदार मेजर’ हि पदवी बहाल केली.

विवाह झाल्यानंतर रामजीबाबांनी आणि भिमाईने अनेक गंभीर प्रसंगांना तोंड दिले; मात्र त्यांनी एकमेकांना डगमगू दिले नाही. त्यांनी आपल्या पोटची ७ मुले गमावली. तर बाळाराम, गंगा, तुळसा, आनंदराव, मंजुळा, रमाबाई, भीमराव यांचा सांभाळ करतांना खूप कष्ट सोसले. कुटुंबातील आर्थिक चढ-उतार, मुलाबाळांचे संगोपन, भिमाईंचा मस्तकशुळाचा आजार आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे रामजीबाबांची कमालीची ओढाताण होत असे, परंतु ते प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले. त्यानंतर काही काळातच १८९४ मध्ये रामजीबाबा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेतून निवृत्त झाले. दरमहा त्यांना ५० रुपये पेन्शन मिळत असे; मात्र तुटपुंज्या पेन्शनमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या प्राथमिक गरजाहि भागत नव्हत्या. त्यामुळे रामजीबाबांनी सातारा येथील पी.डब्लू.डी. च्या कचेरीत स्टोअर किपरची नोकरी सुरु केली. नोकरीकरिता ते सहकुटुंब सातारा येथे स्थायिक झाले. येथे सातारा कॅम्प स्कूलमध्ये भीमराव आणि आनंद यांनी आपल्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात केली. भिवाचे प्राथमिक शिक्षण सुरु असतांनाच रामजीबाबांची नोकरी गेली. पी.डब्लू.डी. च्या कचेरीतील काम संपल्याने रामजी बाबांना आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता आपले बस्तान हलविणे अनिर्वाय झाले. मुलांचे संगोपन आणि शिक्षण याकरिता रामजीबाबांनि थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर रामजीबाबांनि सर्वप्रथम आनंदराव आणि भीमराव यांना परळच्या एल्फिन्स्टन विद्यालयात प्रवेश घेतला, परंतु तुटपुंज्या पेन्शनवर भागत नसल्यामुळे त्यांनी तेथेही नोकरीचे प्रयत्न सुरु केले. आपल्या कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीला हातभार लावता यावा याकरिता भीमरावांचे वडील बंधू आनंदराव यांनीही आपल्या शालेय शिक्षणाला पूर्णविराम देत कंपनीमध्ये नोकरी केली. १८९६ मध्ये भिमाईचे निधन झाले. भिमाईच्या निधनाने रामजीबाबा हताश झाले. परंतु त्यातूनही त्यांनी स्वतःला आपल्या कुटुंबाला सावरले. ते पुन्हा जोमाने उभे राहिले आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू लागले.

रामजीबाबांनी आपल्या मुलाच्या उज्वल भवितव्या करिता त्याला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय शेवटपर्यंत सोडले नाही. भिवा मॅट्रिक उत्तीर्ण व्हावा आणि तेही चांगल्या गुणांनी याकरिता रामजीबाबांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या शब्दात व्यक्त करण्या पलीकडच्या आहेत. स्वतः रात्र रात्र जागून त्यांनी भिवाच्या मनात वाचनाची, लेखनाची, अभ्यासासाठी अविट गोडी निर्माण केली. त्याच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा गाढा ओढणे अशक्य होते, परंतु रामजीबाबांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक वेळा स्वतःच्या जीवाचे रान करून भीमरावांची प्रत्येक शैक्षणिक गरज भागविली. २३ जानेवारी १९१३ ला भीमरावांची बडोदा सरकारच्या सैन्यात लेफ्टनंट नेमणुक करण्यात आली. सदर नोकरीवर रुजू झाल्यानंतर काही दिवसातच रामजीबाबांची प्रकृती खालावल्याची तार भिमरावांना मिळाली आणि ते तसेच बडोद्याहून मुंबईला पोहोचले. रामजीबाबा आणि बाबासाहेबांची ती अखेरची भेट ठरली.

*नागेश टेंभुरकर*
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

COMMENTS

You cannot copy content of this page