वीस वर्षांनंतर ११० माजी विद्यार्थी आले एकत्र
गौतम नगरी चौफेर गडचांदूर | विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावलेल्या आपल्या शिक्षकांना पुन्हा एकदा आठवणींच्या नाजूक गाठीने जोडणारा एक आगळावेगळा सोहळा गडचांदूर येथे पार पडला. सावित्रीबाई फुले विद्यालयाचे माजी विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनंतर एका स्नेहमिलन सोहळ्यासाठी एकत्र आले. या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनात जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला.
गडचांदूर येथील बालाजी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव अडबाले उपस्थित होते, उद्घाटन नामदेव बोबडे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य महेंद्र ताकसांडे, प्रा. सुरेश काटकर, प्रा. कीर्तीकुमार करमरकर, प्रा. धर्मराज काळे, प्रा. शम्मी खान, प्रा. रमेश सोनटक्के, प्रा. प्रशांत खैरे, प्रा. अशोक सातारकर, प्रा. जहीर सय्यद, प्रा. दिनकर झाडे, प्रा. विकास भंडारवार, प्रभाकर पुंजेकर, बालाजी पुरी आदी शिक्षक व मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात ११० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या उत्कट प्रेमाने भारावलेल्या शिक्षकांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते, आणि या अनोख्या मिलनाने गुरु-शिष्यांच्या नात्याची वीण अधिक घट्ट झाली. सूत्रसंचालन संदीप डहाके यांनी केले तर हितेश जाधव यांनी आभार मानले.
इतक्या वर्षांनंतर सर्व एकत्र येण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. हा सोहळा प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.
– सुचिता राजुरकर देरकर, माजी विद्यार्थिनी



COMMENTS