तेलंगणा राज्यातून जिवती तालुक्यात चोर बिटीची तस्करी

HomeNewsनागपुर डिवीजन

तेलंगणा राज्यातून जिवती तालुक्यात चोर बिटीची तस्करी

– तालुक्यात दलाल सक्रिय
– व्यापारी व दलालांकडून “चोर बिटी”  या नावाने अवैधरित्या बियाणांची विक्री
– लक्ष्मी दर्शनामुळे कृषी विभागाचे दुर्लक्ष चर्चेला उधाण

गौतम नगरी चौफेर (हकानी शेख जिल्हा प्रतिनिधी जिवती):- तेलंगणा राज्याच्या सिमेला लागून असलेल्या जिवती तालुक्यातील काही गावांमध्ये शासनाकडून बंदी असलेल्या बोगस बियाणांची अवैधरित्या तस्करी व विक्री वाढली आहे. या बोगस बियाणांची काही व्यापारी व दलालांकडून चोरट्या मार्गाने तस्करी व विक्री करून लाखोंची कमाई केली जात आहे या गोरखधंद्यात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते,या बोगस बियाणांची चोर बिटी या नावाने विक्री केली जाते.
यामध्ये सक्रिय असलेल्या दलालांनी आता जिवती तालुक्यात आपले जाळे पसरवायला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील काही व्यापारी व दलालांनी अनधिकृतपणे कृषी विभागाकडून कसलीही मान्यता नसतांना सर्रास शेतकऱ्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यातील बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांना दुप्पट किंमतीने विकून शेतकऱ्यांची आर्थिक लूट व फसवणूकीचा सपाटा सुरू केला आहे.
शासनाने काही कंपन्यांच्या बियाणांवर बंदी घातली आहे , मात्र जिवतीत काही व्यापारी व दलालांनी चोर बिटी या नावाने अवैधरित्या बियाणे विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे.गेल्या वर्षी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चोर बिटी बियाणांची लागवड केली मात्र काही शेतकऱ्यांची कपाशी पुर्णतः सुकली तर काहींना बोंड अळी सारख्या रोगापासून नुकसानही झाले.
शेतकऱ्यांकडून दरवर्षी बिटी बियाणांची मोठी मागणी असते , मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नाही किंवा ४०० ते ५०० रुपयांची चोर बिटीची पॅकेट एक हजार रुपयात विकून जास्त नफा कमावण्याच्या लालसेने काही कृषी केंद्र संचालक ही बोगस बियाणे शेतकऱ्यांचा माथी मारतात.
या बियाणाबद्दल लोकांमध्ये आमिष दाखवून गवत उगवत नाही,मजुरांचा खर्च वाचतो, तणनाशक असल्यामुळे उत्पादनात वाढ होते, एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पन्न मिळते असे पटवून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री सुरू आहे.
*****************************
#  कृषी विभागाच्या कागदावरच रेघोट्या #
तालुक्यातील कृषी विभाग शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन करत नसून केवळ कागदी घोडे नाचविण्यातच धन्यता मानत आहे.रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची सुपीकता नाश पावते, मातीचे परीक्षण करून कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे, रासायनिक खतांचा योग्य वापर करणे व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते.मात्र तालुक्यातील कृषी सहाय्यक सर्व कामे केवळ कागदावरच करतात.गेल्या वर्षी चोर बिटी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असले तरी कृषी विभागाची डुलकी अजून गेलीच नाही.
*****************************
जिवती तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालक दलालांच्या संपर्कात असून चोर बिटीचा अवैध साठा करून ठेवत असल्याची गोपनीय माहिती आहे.तालुक्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असतांना संबंधित विभाग जाणिवपूर्वक कानाडोळा करत आहे.
तालुक्यात बहुतांश शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेतात, मात्र अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या काही ‘ स्वयंघोषित ‘ सावकारांनी आत्तापासूनच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायला सुरूवात केली आहे हे मात्र नक्कीच!

COMMENTS