दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात; नाली बांधकामासाठी ठोस पावले उचलावीत – नागरिकांची मागणी
गौतम नगरी चौफेर (पत्रकार: विनोद एन. खंडाळे) – गडचांदूर शहरात आज आमदार साहेब विविध विकास कामांचे भूमिपूजन करणार असताना, संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष नगरपरिषदेच्या दुर्लक्षित नालीबांधकामाकडे लागले आहे. मागील काही दिवसांपासून रामकृष्ण हॉटेल ते वीर बाबुराव शेडमाके चौक या भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे, ज्यामुळे जुन्या उघड्या नाल्यांचे पाणी थेट नागरिकांच्या बोरिंगमध्ये मिसळत आहे.
याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, अनेकांना पोटदुखी, जुलाब, उलटी यांसारखे आजार झाले आहेत. नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे संतप्त नागरिक वारंवार तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही.
नागरिकांचा आक्रोश एवढा वाढला आहे की, आज आमदार साहेबांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात देखील त्यांचे लक्ष या आरोग्य संकटाकडे वेधले जावे, अशी आशा व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या ठोस मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
1. दूषित पाणीपुरवठा तात्काळ थांबवावा.
2. नाल्यांचे पाणी बंदिस्त करण्याचे तातडीने काम सुरू करावे.
3. आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत.
4. दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.
5. आमदारांनी या गंभीर समस्येवर ठोस भूमिका घ्यावी.
जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेळेवर पावले उचलली नाहीत, तर नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. गडचांदूर शहर सध्या केवळ विकासाच्या घोषणांवर नव्हे, तर आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांवर कृतीची वाट पाहत आहे.
आजच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण शहराला एकच अपेक्षा आहे – “विकासाच्या जोडीला आरोग्याची हमीही हवी!”

COMMENTS