गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा विशेष प्रतिनिधी – रखरखत्या उन्हात तर कधी वादळवा-यात,काटेरी वाटेवरुन चालणारी अनेक कठिण प्रसंगात पून्हा नव्याने उभी राहणारी स्त्री. पूरातन काळापासून अनेक मोठमोठ्या उपमा स्त्री नावाच्या प्राण्याला देण्यात आल्या.कधी दुर्गा ,कधी चंडिका तर कधी महाकाली. पण वास्तविक पाहता ज्या विवंचनेतून स्त्रियांना जावं लागते त्याची कल्पना ही करु शकत नाही. फार कमी स्त्रियां सन्मानाचं, स्वातंत्र्याचं ,निर्णय क्षमतेचं जिवन जगत असतील यात काही शंका नाही पण अधिकांश स्त्रियांना हालअपेष्टेचे जिवन जगावं लागतं.
अतिशय संवेदनशील विषयावर लिहितांना मन भरुन सुध्दा येत आहे.पण मानवी जिवन जगत असतांना निसर्गाने स्त्री आणि पूरुषात कमालीची रचना केली आहे याला आपण नाकारु शकत नाही.स्त्री,पूरुष तुलनेचा विषय नाही.
मानवाच्या शरीरातील छोट्यातला छोटा अंग सुध्दा अतिशय महत्वाचा आहे .नखाला सुध्दा इजा झाली तर त्याची धग मस्तकात पोहचते.
निसर्गनिर्मित महिलांना गर्भाशय आहे .एक अद्वितीय आणि महत्वाचा शरीराचा अवयव.आजपर्यत कुठे ऐकिवात नसेल की एखाद्या स्त्री ला गर्भाशय नसेल.
आणि गर्भाशयाच काम फक्त प्रजनन क्रियेसाठी च नाही तर तो तिचं अस्तित्व देखील आहे .बाळाला जन्म न देता ही आई होऊ शकते इतकी माया,ममता स्त्री च्या मनात दाटलेली असते.
गर्भाशय आहे म्हणून च महिन्याला मासीक पाळी सुध्दा येत असते.ती कोणत्याही वयातली असो अगदी बाराव्या वर्षापासून तर पन्नाशी पर्यंत चा हा प्रवास ती पार करते इथे वय अपवाद आहे. आजच्या जिवनशैलीनुसार शरिरात ही अनेक बदल होत असतात. पाळीच्या दिवसात होणारा त्रास, हार्मोन्समुळे मूड स्विंगस् ,दुखणं इत्यादी.. अलीकडच्या काळात गर्भाशयाच्या समश्या मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात. पूर्विपण होत असतील पण ते उघडकीस येत नव्हते जेवढे आता माध्यमातून ,सोशल मीडिया वर किंवा दवाखान्यातील अहवालानुसार ऐकायला येतात. कमी वयात लग्न ,मुलं झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागते जसं खूप रक्तस्त्राव होणे असे अनेक कारणं अगदी तिशी च्या अलिकडेच व्हायला लागलेत.
अनेक उपचार पध्दती पण आहेत.
तरीसुध्दा गर्भाशय काढून टाकणे हा पर्याय अगदी शेवटचा असला पाहिजे.शरीरातील एक महत्वाचा अवयव निकामी करणे ही लहान बाब नाही.त्यांनतरही अनेक समश्यांना सामोरे जावं लागते.डाँक्टरांना आपण एखाद्या रक्षणकर्त्यासारखाच समजतो आणि हे सत्य देखील आहे .कधी कधी डाँक्टरांच्या प्रेमळ बोलण्याने च अर्धा आजार पळतो. पण तेवढेच हेही सत्य आहे की मानवता कमी आणि व्यवसाय जास्त अशी परिस्थिती पाहायला मिळते…असो
तरीसुध्दा आवर्जून सांगावं वाटेल की बहूतांश स्त्री या व्यवसायाला बळी पडतात.कारण डाँक्टर जे मार्गदर्शन करतात आणि सोपस्कार करून सांगतात तेव्हा नाईलाज असतो .
मूळ मुद्दा आहे की ज्या ऊसतोड महिला आहेत त्यांचे गर्भाशय काढून घेतले जातात किंवा महिला स्वतः च्या मर्जिने काढतात .
2019च्या सरकारी अहवालानुसार
(आकडेवारी)तब्बल 17 % ऊसतोड मजूर महिलांनी गर्भाशयाची शस्त्रक्रिया करवून घेतली होती,….
हा स्वतः च्या आरोग्याशी ,जिवाशी खेळण्याचा च भाग आहे.
काही दिवसांपूर्वी वाचण्यात आलं होतं कामात व्यत्यय येऊ नये म्हणून किंवा सुट्टी पडू नये म्हणून जबरदस्तीने दबावाखाली काढण्यात येतो.सोशल मिडीयावर ही हतबल करणारी बातमी फिरत होती हे वाचूनच एकदम हतबलता वाटली कि एवढं कसं काय जिवघेणा प्रसंग महिलांवरती येत असेल .2024च्या सर्वेक्षणावरून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील 843 महिलांना ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी गर्भाशयाची शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यातील ऊसतोड महिला अवघ्या 30 ते 35 वयोगटातील होत्या. का तर म्हणे यांना हंगामी काम दिलं जातं दिवसाला 12 ते 14 तास .सुट्टी नाही,काम चुकलं तर दंड मासीकपाळी मुळे एक दिवस काम चुकलं तर हातात पैसा कमी पडतो म्हणून.
तर कधी उसाच्या मोळ्या डोक्यावर घेत असताना ओटीपोटात त्याची झळ पोहोचते आणि जास्त रक्तस्त्राव होतो म्हणून.
बीबीसीच्या एका न्यूज मध्यें हे देखील सांगितले होते की वय कमी असलं तर वय वाढवून दूसरे आधार कार्ड सुद्धा बनवितात आणि शस्त्र क्रिया करवून घेतात. पण शस्त्रक्रिया केल्यानंतरही अनेक आजार उद्भवतात हे या महिलांना समजत नसेल का??
ही अज्ञानता आहे ,सरासरी खोडसाळ पणा आहे.आणि सोबतच व्यवस्थेचा अमाणूस चेहरा आहे . प्रचंड दबावाखाली खाली येऊन या महिला पोटाची भाकरी कमविण्यासाठी पोटच कापून घेणेहा निंदणिय प्रकार आहे. पाळीच्या दिवसांपूर्वी पासून प्रत्येकांच्या शरीरयष्टी प्रमाणे त्या पाच दिवसांत त्रास असतोच आणि आपोआपच नष्ट ही होतो. असते.या आणि अशा महिलांचे समूपदेशन होणे गरजेचे आहे.
मासिकं पाळी ही निसर्गतः: महिलांना मिळालेलं वरदान आहे .काही महिला याला तुच्छ मानतात तर आजही अंधश्रद्धा,अज्ञान यामुळे स्वतः ला हिनतेची वागणुक देतात खरंतर या विषयांत महिलांनीच पूढाकार घेऊन स्वतः च्या विचारात ,आचरणात बदल केला पाहिजे , पूर्ववत ज्या गोष्टी घडत आलेल्या असतील त्यात स्वतः च बदल घडविला पाहिजे .तरच या गर्तेतून मार्ग काढता येईल.

संस्थापक यश बहूउद्देशिय संस्था तुमसर
आज पूर्ण महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत . अनेक मंजूरांचे स्थलांतर केले जाते अगदी भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा साखर कारखान्यासमोर सुध्दा या मंजूरांचे पाल* बघायला मिळतात. हा विषय गंभीर आहे .
*नुसतं रोजीरोटी कमविण्याचा *विषय* नाही तर त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक आणि आर्थिक या सर्व बाबी विचारात घेतले तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे काय ????
शासन साखर शाळा अतंर्गत एक शिक्षक नेमतो पण खरोखर यांचा फायदा होतो काय??किंवा पूर्णपणे त्यांना शिक्षण घेता येत असेल काय???
कधी या गावी तर कधी त्या गावी गेल्यावर शिक्षणाची आवड तरी निर्माण होत असेल का त्या निरागस गरीब मुलांमध्ये ???
एक महिला ही संपूर्ण घराचा आधार स्तंभ असते.ती निरोगी असली तर अख्खं घर प्रफुल्लित असतो.
गरिबी, दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे जर स्त्रीयांना स्वतः च्या जिवावर बेतावं लागत असेल तर उपजिवीकेचे दुसरे माध्यम शोधले पाहिजे ,व्यवस्थेने सुद्धा त्याच्यावर दबाव आणून असे कृत्य करायला भाग पाडले नाही पाहिजे. आणि जिथे कुठे आढळत असेल तिथे शासनाने कठोर पावलं उचलली पाहिजे.
कारण ही त्या महिलांच्या गरिबीची, शोषणाची व व्यवस्थेच्या अमाणूष चेह-याची व्यथा आहे.गोड साखरेमागची कडू कहाणी. सुनिता टेंभूर्णे संस्थापक यश बहूउद्देशिय संस्था तुमसर, भंडारा
