गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ३० ऑगस्ट निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीसोबतच “आपणही समाजाचे काही देणे लागतो” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खिर्डी येथे वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपणा तालुका युवती उपाध्यक्ष सौ. मयुरी राजेश मालेकर यांनी त्यांचा मुलगा चिरंजीव देवांशू राजेश मालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविला. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेच्या कोरपणा तालुका अध्यक्षा अरुणा सालवटकर, उपाध्यक्ष किरण अहिरकर, युवती उपाध्यक्षा मयुरी मालेकर, संघटिका वंदना मोरे, रंजना पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खिर्डीचे मुख्याध्यापक चंद्रकांत पांडे, राजेश मालेकर, शिक्षिका ज्योत्सना येनुरवार तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ आनंदोत्सव न करता वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटपातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा मालेकर कुटुंबीयांचा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
“पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असून, समाजासाठी आपणही काहीतरी देणे लागतो,” हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालमनावर बिंबविण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

