– राजुरा येथे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर.
गौतम नगरी चौफेर राजुरा, दि. २७ एप्रिल
देशव्यापी स्तरावर गोवंश संरक्षण, संवर्धन व सन्मान यांसाठी राबविण्यात येत असलेल्या “गो सन्मान आह्वान अभियान” अंतर्गत भारताचे पंतप्रधान यांच्याकडे सविस्तर व ठोस निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनाद्वारे गोमातेच्या संरक्षणासाठी कठोर व प्रभावी केंद्रीय कायद्यांची निर्मिती करावी, तसेच गोपालन व गोसंवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली आहे.
निवेदनात देशातील गोवंशाची विद्यमान स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे अधोरेखित करण्यात आले असून, गोतस्करी, गोहत्या तसेच रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या हानीवर तातडीने आळा घालण्यासाठी सक्षम व कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. गोसंवर्धन हा केवळ धार्मिक आस्थेचा विषय नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, गोआधारित नैसर्गिक शेती पद्धतींचा प्रसार व अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळून ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेस बळकटी मिळेल, असा ठाम विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रपती,पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना राजुरा येथून पंधराशे पत्र स्वाक्षरी करून पाठवले आणि या मागणीकडे लक्ष वेधून घेतले आहे. रासगोभक्त, सामाजिक कार्यकर्ते तसेच सजग नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या निवेदनाकडे केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हे निवेदन राजुरा येथे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी कृष्णदास गोस्वामी महाराज, गोरे महाराज रामपुर, ठाकरे महाराज, पंढरी लोहे, अरविंद वाघाडे, मनोज झाडे, निखिल मेंढे, अमोल आकनूरवार, साईनाथ मते, दत्ता कुळकर्णी गुरुजी, अर्चना जॉन, विल्सन प्रिया मुंजमवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.


COMMENTS