केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती
गौतम नगरी चौफेर चंद्रपूर, ता. २१: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी केवळ बौद्ध समाजावर अवलंबून राहता येणार नाही. सर्व समाजांना सोबत घेऊन पक्ष विस्तार करावा लागेल. आमदारकी लडविण्यासारखे उमेदवार पक्षाकडे नसल्याने कार्यकत्यांनी गावागावांत जाऊन काम करावे. सर्व गट एकत्रित आल्यास रिपाईला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९९० मध्ये सर्व गट एकत्र येऊन निवडणूक लढवल्या होत्या, तेव्हा यशसुद्धा आले होते. मात्र, त्यानंतर विभागणी झाली. आता राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी, सर्व गटांनी पुन्हा एकत्र येण्याची गरज आहे. अॅड. बाळासाहेब आंबेडकर लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवत आहेत, पण त्यांचा पक्ष अद्याप राष्ट्रीय दर्जा प्राप्त करू शकला नाही. त्यामुळे अॅड, बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे. मी कोणत्याही पदावर काम करण्यास तयार आहे. बरि, राजाभाऊ खोबरागडे यांना राज्यात मोठा वर्ग मानतो. त्यांच्या पक्षालाही एकीकरणात समाविष्ट करू. तेव्हाच सत्तेत भाग घेणे शक्य होईल.

आठवले यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीवरही प्रकाश टाकला. अमेरिका इराण युद्ध सुरू असून जगभर अशांतता आहे. तरी भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला जगातील पहिल्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार केला आहे. भारताचे इराण व अमेरिकेसोबत चांगले संबंध आहेत, असे त्यांनी सांगितले. नुकत्याच ४५ हजार कोटी रुपयांच्या डीलमुळे लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. छोट्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येत आहे. देशातच कच्चा माल तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने छोट्या उद्योगांसाठी सबसिडीचा निर्णय घेतला असून, ग्रामीण भागातील उद्योगांना ९० टक्के सूट देण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रिपाइंच्या विस्ताराबाबत आठवले यांनी अभिमान व्यक्त केला. रिपाइंचा खासदार संसदेत सहावेळा गेल्याचा इतिहास घडला आहे. देशातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांत रिपाइंच्या शाखा सुरू झाल्या आहेत. हे केवळ मी दिल्लीत गेल्यामुळे शक्य झाले. दोन राज्यांत मान्यता मिळवली आणि महाराष्ट्रातून दोन खासदार निवडून आले तर रिपाइंला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळेल, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सत्तेत रिपाइंला अपुरा वाटा मिळत असल्याची तक्रार करत आठवले म्हणाले, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष मोठे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, एक विधानपरिषद जागा व महामंडळे देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला विजय आगलावे, दयाल बहादुरे, बाळू घरडे, अशोक घोटेकर, गौतम तोडे, विकीराज वानखेडे,प्रभाकर खाडे यांची उपस्थिती होती


COMMENTS