गौतम नगरी चौफेर (श्नीकृष्ण देशभ्रतार भंडारा) – आज २४ जानेवारी — राष्ट्रीय बालिका दिन. देशभरात विविध माध्यमांतून बालिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. “मुलगी म्हणजे शक्ती”, “मुलगी म्हणजे भविष्य” अशा घोषणा ऐकू येतात. मात्र या घोषणांच्या गजरात एक अस्वस्थ करणारे वास्तव दुर्लक्षित तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो — खरंच आज आपल्या देशातील बालिका सुरक्षित आहे का?
आजची बालिका घराबाहेर पडताना केवळ दप्तर घेऊन निघत नाही, तर मनात भीतीची सावली घेऊनच निघते. रस्त्यावरच्या टकमक नजरा, असंवेदनशील वागणूक आणि वाढते लैंगिक अत्याचार यामुळे तिचे जीवन दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. ही असुरक्षितता केवळ महानगरांपुरती मर्यादित नसून खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेली आहे.
आपण मुलीला ‘लक्ष्मी’ म्हणतो, पण शिक्षण, सुरक्षितता आणि निर्णयप्रक्रियेत तिला दुय्यम स्थान दिले जाते. जन्माच्या वेळी जल्लोष करणारा समाज हळूहळू तिच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालू लागतो. “सांभाळून वाग”, “असं करू नकोस”, “तिथे जाऊ नकोस” — असे निर्बंध तिच्यावरच लादले जातात, पण चुकीच्या मानसिकतेविरुद्ध समाज म्हणून आपण किती ठामपणे उभे राहतो, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
आज परिस्थिती अशी आहे की घराबाहेरच नव्हे, तर शाळेत, शाळेच्या वाहनांमध्ये आणि ओळखीच्या व्यक्तींमध्येही बालिका सुरक्षित नाही. बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचे अपयश नाहीत, तर समाजाच्या संवेदनशीलतेचे अपयश आहेत. प्रश्न कायद्याचा जितका आहे, तितकाच तो मानसिकतेचाही आहे.
खेडेगावातील एखादी मुलगी शिक्षण घेत असते, तेव्हा ती फक्त स्वतःचे आयुष्य घडवत नसते; ती आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करत असते. तिच्या हातातले पुस्तक म्हणजे बदलाची ठिणगी असते. मात्र ती ठिणगी ज्वाला बनवायची जबाबदारी केवळ त्या मुलीची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे.
राष्ट्रीय बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस न राहता आत्मपरीक्षणाचा दिवस व्हायला हवा. सहानुभूती नव्हे, तर सन्मान; बंधने नव्हे, तर संधी; आणि मौन नव्हे, तर ठाम भूमिका — हीच काळाची गरज आहे. मुलींना सुरक्षिततेच्या नावाखाली मर्यादित करण्याऐवजी मुलांना जबाबदारीची जाणीव करून देणे अधिक आवश्यक आहे.
ज्या दिवशी आपल्या मुली भीतीशिवाय घराबाहेर पडतील,
ज्या दिवशी त्यांच्या स्वप्नांना पंख छाटले जाणार नाहीत,
आणि ज्या दिवशी अन्यायाविरुद्ध समाज मौन सोडेल —
त्या दिवशीच आपण खऱ्या अर्थाने प्रगत राष्ट्र म्हणून उभे राहू.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने शुभेच्छांबरोबरच कृतीची बांधिलकी स्वीकारणे, हीच या दिवसाची खरी सार्थकता ठरेल.
डॉ.प्रा.देवानंद नंदागवळी


COMMENTS